[ १०४ ] ।। श्री ।। ४ आक्टोबर १७५७.
पे॥ छ १९ मोहरम मंगळवार दोन प्रहर दिवस
महीपतराव लक्ष्मण
सेवेसी विज्ञापना ऐसीजेः - परवाचे दिवशीं नवाबास मोहोरकबंदी द्यावयासी राजश्री जानोजी निंबाळकर आले होते. मुबारकबादी देऊन नवाब बसालतजंगाचे डे-यांत येऊन बसले. तेथें उभयतांसी भाषण जाहलें कीं नवाबास दौलताबादेस शहानवाजखानापाशीं पावतें करावें, हा आळा निंबाळकरास आला होता. त्याचा परिहार जाला. नवाब बसालतजंगास कळलें कीं यांजपासून ही गोष्ट सहसा होणार नाहीं. तेव्हां नवाबांहीं गळ्यांत हात घालून पोटासीं धरले. तुह्मांपासून उमेद मोठीसी आहे. चित्तांत किलमिष होता तो दूर केला असे. सेवसी श्रुत होय. वेदमुहूर्ती दीक्षित महाराव जानोजींचे घरास आले होते. साता-यास उपद्रव फार लागला आहे. आह्मी जावें कीं राहावें? महारावजीनें समाधान केलें कीं तुह्मास काय चिंता आहे. समाधानें राहाणें. आज सायंकाळीं मुरादखान व विठ्ठल सुंदर महारावजीपाशीं येऊन मसलत एकांतीं करीत बसले होते. महारावजीकडील विठ्ठलरावहि होते. चौघेजण चार घटकापर्यंत दिवाणखान्यापुढें बाग आहे तेथें बसोन एकांत केला. मनास परस्पर आणिता निजामअल्लीस महाराव अद्यापि भेटले नाहींत. भेट घ्यायी ह्मणत होते. उत्तर महारावजीनें केलें कीं आह्मांस भेटीवाचून काय प्रयोजन ? त्याचे भावासी भेटलों, तें त्यासीच भेटलों. तें व हे एकच आहेत. हरपेकापाशीं राहोन नोकरी करावी. बहुतेक भेटीस उद्या परवा जातील. राजश्री वेंकटराव निंबाळकरहि भेटले नाहीं. याची जाल्यावर त्याची होईल. कळलें पाहिजे. बहुत काय लिहिणें. हे विनंति.