।।श्री।।
पु॥ तीर्थस्वरूप राजश्री राजे जीवनराव स्वामी वडिलाचे सेवेसीः-

विनंति त॥ माजूर येथील निशापातीचा मजकूर दोन तीन पत्रीं लिहिला होता. त्याप्रमाणें नवाब समसामुद्दौलाबहादर यांसी निवेदन केला. व त्याणीं आज्ञा केली त्याप्रमाणें आपणास लिहिलेंच आहे .पाहून अर्थ ध्यानास आलाच असेल सांप्रत नवाबासाहेबांनीं फिरोन आज्ञा केली जे मृगसाल अखेर जालें. अद्याप पैसे येत नाहींत. जागीर नवाबाचे धाकटे भाऊ मीरमोगल यांची आहे. ते आपले पैशाकरिता आखंड ह्यणतात. यास्तव त्याचे आज्ञेप्रमाणें लिहिलें जातें कीं तेथील ताहुदापैकीं सर्व हप्तेबंदी आपण लिहून पाठविली त्याप्रमाणें वायदेहि आकार जाले. तरी पैसे ताहुदाचे झाडियानसी हुंडी करून पाठविले पाहिजेत व मुतसदी यांचा खर्चहि तीर्थस्वरूप पंतांनीं ठहरविला होता त्याप्रमाणें मुतसदीं यांचाहि ऐवज पाठविला पाहिजे. ज्या गोष्टीनें येथें आह्मांस बोलावयासी उजागिरी राहे तो अर्थ केला पाहिजे. सारांश कुल पैसे लौकर पाठवावे हे विनंति.

राजश्री शानजीपंत दि।। शहानवाजखान याची जागीर मौझे गोसेगांव प॥ अंतुर आहे. अशास, म।।रनिलेचे जागिरीचा अंमल नवाब समसामजंगाचे जागिरीप्रमाणें घेत जाणें. ऐसें आज्ञापत्र श्रीमंताचे राजश्री नारोबा बाजी याचे नांवें हसल होत असले तरी प्रयत्न करून पाठविलें पाहिजे. हे विनंति. राजश्री अवधूतरावबाबा येथें गंगाजान्हवी मातुश्री बयाबाईचे भेटीस जेष्ठ शुद्ध एकादशीस आलेत. मजलाहि दर्शनाचा लाभ घडला. दोन चार दिवस राहून नवाब समसामजंगाची भेटी घेऊन रुखसत होऊन जातील. कळावे ह्मणोन लिहिलें असे. हे विनंति. र।। छ १४ रमजान, बुधवार.

कांही आज्ञापत्रें चिरंजीव रा।। नारायणरायाचे नांवचीं होतीं व कांही माझे नांवें होतीं. त्यास त्याचे नांवें होतीं त्याचे जवाब त्याचेच नांवें लिहून पाठविलेत. माझें नांवें होतीं त्यांतील मजकुराचे जवाब मी विनंतिपत्रीं लिहिला. ते येका जागा पुरवणिया पत्रांच्या मिळतील, यास्तव लाखोटे वेगळाले करून पाठविलेत. कळले पाहिजे. आपणास पत्राचा जवाब शहानवाजखानांनी लिहिला तो मुनशापासून गुना जाला. मागून दुसरा तयार करून पाठवितों. हे विनंति.