Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

प्रस्तावना 

कनोजा ब्रह्मेंद्रस्वामीकडे फिर्याद घेऊन गेला. तेव्हा ब्रह्मेंद्रानें त्याला संभाजी आंग्र्यांकडे शिफारसपत्र देऊन पाठविले, “आणि तुमच्या कामाकरिता ह्याचा घात झाला, तेव्हां तुम्हीं ह्यास अवश्यमेव आश्रय दिला पाहिजे.” अशी निक्षून संभाजीस आज्ञा केली. संभाजीनें ही आज्ञा शिरसा मानिली असती, परंतु लौकिकात केवळ गौण दिसेल ह्या भीतीने ती मानण्याचें त्यानें मोठ्या दिलगिरीनें नाकारिलें (लेखांक २६६). शिवाय ह्यावेळी ह्या दोघां भावांचा समेट होण्याचा संभव होता. तेव्हा ब्रह्मेंद्राची आज्ञा एकदम अमलांत आणणें संभाजीस किंचित कठिणच पडलें. असो. पुढें लवकरच संभाजीची व सखोजीची तडजोड झाली. ह्या दोघां भावांमधील भांडण काहीं वेळ स्तब्ध झालें, व ब्रह्मेंद्रस्वामीचा हा डावपेच त्यावेळेपुरता तसाच पडून राहिला.

८ सातारकर छत्रपतींचा कोंकणपट्टींत आंग्र्यांच्या हस्ते जो अंमल चालत असे, त्याविरुद्ध १७३० च्या सुमारास पांच चार राष्ट्रें खटपट करीत असत. मुंबईकर इंग्रज, राजपुरीकर शामळाला मदत करीत असत. चेऊलवर फिरंगी रिकाम्या फुशारकीनें हिंदू लोकांना त्रास देत. कोल्हापूरकर छत्रपति मात्सर्यानें दक्षिण कोंकणांत ढवळाढवळ करीत. वाडीकर सावंत कोणीकडे कांहीं तरी मेहनत करीत, व राजपुरीकर शामळ त्वेषानें मराठ्यांशीं लढत असत. खरें पाहिलें, तर राजपुरीकर शामळ दिल्लीच्या पातशाहाचे पुरातन सेवक होत. दिल्लीचा पातशाहा तर मराठ्यांच्या कचाटींत पूर्णपणे येत चालला होता. अशा वेळी मराठ्याशीं सख्य करून त्यानें आपली सुरक्षितता कायम ठेवावयाची हा शहाणपणाचा मार्ग होता. परंतु मुसलमान लोकांच्या अगीं दिसून येणारा जो आडदांड हेकटपणा त्याने हट्टास पेटून राजपुरीकर शामळ मराठ्यांस, १७२६ पासून अथवा त्याच्याहि पूर्वी बरीच वर्षे, एकसारखा त्रास देत होता, त्याला मुंबईकर इंग्रज आणि चेऊल व वसई येथील फिरंगी मदत करीत असत. मुंबईकर इंग्रजांचा मुंबईच्या बेटाखेरीज इतरत्र अंमल नसल्यामुळे, त्यांना पाण्यावर गाठून तंबी देण्याखेरीज इतर उपाय नव्हता. हा उपाय आंग्र्यांनीं उत्तम त-हेने चालविला होता. ह्या त्रिकूटांतील शिल्लक राहिलेले जे शामळ व फिरंगी त्यांची मात्र कोंकण किना-यावर बरीच मालमत्ता असे. अर्धे चेऊल शहर व साष्टी बेट फिरंग्यांकडे होतें. शामळाकडे तर उत्तर कोंकणांतील बरेच परगणे होते. ह्या परगण्याशेजारील जो मराठ्यांचा प्रांत त्याची व्यवस्था श्रीनिवासराव प्रतिनिधीकडे असे. तेव्हां शामळाशीं लढण्याचा मक्ता त्याजकडेस शाहूमहाराजांनीं सोंपविला, व फिरंग्यांवर मोहीम करण्यास पिलाजी जाधवराव यांस सांगितलें. पिलाजी जाधवराव व श्रीनिवासराव प्रतिनिधी साता-यास बाजीरावाविरुद्ध मसलत करीत असत, तेव्हां त्यांचा रोग साता-याहून उखडून काढण्यास ही कामगिरी सांगण्याची शक्कल बाजीरावाने शोधून काढिली. १७२९ च्या जूनांत गद्देकोट येथें पिलाजी जाधवराव याची सरदारी बाजीरावाने तगीर केली होती. तेव्हांपासून १७३० च्या मेपर्यंत पिलाजी घरींच बसून होता. त्यास १७३० च्या मेंत कोळवणांत फिरंग्यांवर पाठविलें (शकावली पृष्ठ ५९) व त्याच सुमारास श्रीनिवासरावास कुलाबा-रत्नागिरीकडे रवाना केलें. लढाईचा सराव नसल्यामुळे, श्रीनिवासराव कोंकणात केवळ माशा मारीत बसला (खंड ३, लेखांक २४९).