Super User

Super User

हिंदु समाजात हिंद्वितरांचा समावेश

राजवाडे यांच्या विचारप्रणालीची संक्षेपाने मांडणी करणे अवघड काम आहे. त्यांच्या "हिंदु समाजात हिंद्वितरांचा समावेश" या लेखाची वर्ण व जातिभेदाच्या चर्चेला, ती मोडण्याच्या चळवळीला व या चळवळीत आज जी द्वेषभावना येते तिला सौम्यत्व आणून तिला वर्गीय व शास्त्रीय दृष्टीने नष्टभूत करण्याचे काम सुकर होण्यासाठी मार्क्सवादी समाजशास्त्राच्या जोडीला बरीच मदत होण्यासारखी आहे. वर्ण व जातिसंबंधांची उत्पत्ती, उत्पादनाची हत्यारे व तज्जानित समाजसंबंध या सिद्धान्ताच्या पूर्ततेला राजवाड्यांचा हा निबंध अत्यंत उपकारक ठरतो. हिंदूंच्या ग्राम व समाजरचनेचा विचार करताना राजवाडे म्हणतात : "ग्राम किंवा नगर म्हटले म्हणजे ते अठरा पगड जातीखेरीज इतरांचे बनलेले नसे. प्रत्येक धंद्याची स्वतंत्र जात असून त्या जातीचे ग्राम बने. प्रत्येक जात ही आपापल्या धंद्याची वतनदार होती. ज्याला वृत्ती म्हणजे वतन नाही असा मनुष्य ग्रामात हक्काने राहू शकत नसे. इतर ग्रामातून कोणी बेकार आर्य मनुष्य ग्रामात राहण्याची इच्छा करू लागला तर ग्रामातील वृत्तिवंतांची म्हणजे वतनदारांची ग्रामसभा भरून त्यांनी एकमताने- बहुमताने नव्हे-- परवानगी दिली तर त्याची स्थापना गावात होई व तीही उपरी म्हणून हाई. उपरीचा मिरासी म्हणजे पिढीजात ग्रामस्थ होण्यास कित्येक पिढ्या जाव्या लागत. ही कथा आर्य उपरींची झाली.
"अनार्य लोकांचा समावेश ग्रामसंस्था काही विशेष संस्कार झाल्याखेरीज होऊ देत नसत. अनार्य दोन प्रकारचे असत. एतद्देशज अनार्य व बहिर्देशज अनार्य. एतद्देशज अनार्यात नाग, कोल, भिल्ल, गोंड पुक्कस, कातकरी, ठाकुर वगैरे लोक येत. बहिर्देशज अनार्यांत शक, यवन, पारसीक, बाल्हिक, मुसलमान वगैरे लोक येत. नाग, कोल व राक्षस हे या देशात आर्यांच्या पूर्वीचे लोक होत. आर्यावर्तांत व दक्षिणारण्यात व अपरान्तात ग्रामसंस्था जेव्हा केल्या तेव्हा या एतद्देशज अनार्यांना ग्रामसंस्थेत कोणते स्थान कसे द्यावे याचा विचार पडला. या विचारातून सुरक्षितपणे पार पडण्यास आर्यांचा पूर्वीचा एक प्रघात उपकारक झाला. गुणानी व कर्मांनी भिन्न इसमांचे निराळे वर्ण करण्यास आर्य फारे पुरातन कालापासून शिकले होते. त्या शिक्षणाचा ऊर्फ सतत मनःप्रवृत्तींचा परिणाम चातुर्वर्ण्य होय.

"चातुर्वर्ण्यातील चारी वर्ण बीजक्षेत्राने पृथक् होण्यापूर्वी अनुलोम व प्रतिलोम संबंध घडत. त्या संबंधापासून जी प्रजा निर्माण होई तिला तीन पिढ्यांनी किंवा पाच पिढ्यांनी किंवा सात पिढ्यांनी मूळ पित्याच्या वर्णात परत जाता येई.

मराठी धातुकोश

शास्त्राची चर्चा करताना किंवा तद्विषयक ग्रंथाची पहाणी करताना, दुरभिमान, मत्सर, असूया इत्यादि भावनांना जागा देणे योग्य नसते, तसेच शास्त्रशुद्ध नसते. पण राजवाडे यांच्या बुद्धितेजाने व ज्ञानसंपन्नतेने जे दिपून गेले ते वरील अनेक मानसिक रोगानी पछाडले गेले होते. त्यांच्या मरणोत्तर त्यानी रचलेल्या मराठी धातुकोशाला मारण्याचा जो काही लोकांनी प्रयत्न केला त्याची आठवण ठेवणे जरूर आहे. पाणिनीने वाटल्यास संस्कृतचा धातुपाठ लिहावा. ज्ञानकोशाची रचना करताना डॉ. केतकरांचे व त्यांच्या सहायकांच्या नाकी नव आले व शेवटी ते दारिद्रात मेले. असे असता स्वतःच्या एकटयाच्या मेहनतीवर मराठी धातुपाठ तयार करणारा हा प्रतिपाणिनी कोण अशीही मत्सरग्रस्त पृच्छा झाली. विशेष म्हणजे पाणिनीच्या धातुपाठांची संख्या दोन हजारापर्यंत आहे तर राजवाडे यांच्या मराठी धातुपाठांची संख्या जवळजवळ सोळा हजार भरली. कोणतीही कमिटी न करता किंवा सरकारदरबारीच्या लाखोंच्या देणग्या न मिळता या फाटक्या मनुष्याने एकटयाच्या विद्वत्तेवर एवढा मोठा मराठी धातुपाठ करणे शक्यच नाही व केलाच असला तर तो रद्दीमय असावा हे नक्कीच, तेव्हा तो टाकून द्यावा अशीही काही विद्वानात बोलवा झाली होती. पण शेवटी एक कमिटी नेमूने जांच-पडताळा होऊन हा खरोखरच धातुपाठ आहे असे सिद्ध झाले. शेवटी श्री. कृ. पां. कुलकर्णी या विद्वान गृहस्थांनी तो संपादन केला व धुळ्याच्या राजवाडे संशोधन मंडळाने छापून प्रसिद्ध केला ही एक ऐतिहासिक व अभिनंदनीय गोष्ट घडली.

पण हे काम अद्याप संपूर्ण झालेले नाही. धातु देताना पूर्ववैदिक, वैदिक, पाणिनीय संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश व चालू मराठी इतक्या भिन्नभिन्न स्वरूपात हे धातु कसे आढळतात व त्यांचा वाङ्मयीन वापर कसा झाला व स्थित्यंतरे कशी झाली एवढा मोठा प्रपंच दाखविण्याचा राजवाडे यांचा बेत होता; पण ते काम पूर्ण करण्यास आणि एकट्याच्याने करण्यास त्यांना वेळ मिळाला नाही. आता हे काम कोणते भाषाशास्त्रज्ञ अंगावर घेतील ते पाहायचे. फडतूस ग्रंथासाठी लाखोंची अनुदाने देणा-या आमच्या सरकारला या ग्रंथाची महती काय हे समजायला किती वर्षे जावी लागतील किंवा स्थित्यंतरे होतील कुणास ठाऊक ?
या विषयाचे सामाजिक महत्त्व समजावे म्हणून श्री. कुलकर्णी यांच्या प्रस्तावनेतील एक विधान येथे देत आहे. " एखादा समाज सुधारणेच्या कोणत्या अवस्थेत आहे. हे पहावयाचे झाले तर त्या समाजाची भाषा पहावी. त्यातही पुनः तिचा शब्दसमूह पहावा, त्यातही पुनः तिचा धातुपाठ पहावा. अशा रीतीने धातुपाठाचे मानवशास्त्रात किती महत्त्व आहे हे कळून येईल.” [" राजवाडे मराठी धातुकोश प्रस्तावना" पान ११ ].

अशा या मराठी धातुपाठाची रचना करणा-या आचार्याची महती वर्णन करावी तितकी थोडीच. राजवाडे यांचा स्वभाव, चरित्र, विद्वत्ता, विचारपद्धती यांचे वर्णन करायचे तर धातूंना जे सूत्र लावले आहे तेच त्यांना लावावे लागेल. सतत पुरोगामी गतिमानता हाच त्यात स्थायीभाव होता. "गत्यार्थास्तेज्ञानार्थाः"

पुराणगत इतिहासकथन

संस्कृतमधील पुराणे आणि ग्रंथ यांना इंग्रजी राज्यकर्त्यांनी भाकडकथा म्हणून नाव दिले. त्याचा प्रभाव आपल्या येथील अनेक विद्वानांवर अद्याप आहे. पुराणग्रंथातील उल्लेख व कथा अद्भुतमय रंगात सांगितल्याही आहेत; पण त्यामध्ये इतिहाससत्याचे मूळ आहे व त्यावर भ्रामक समजुतींचा डोलारा तत्कालीन लेखकानी आधुनिक शास्त्राच्या अभावी रचला हेही खरे आहे. या डोला-यात इतिहाससत्याचा अंशही नाही ही समजूत आता रद्द ठरली आहे. इजिप्तच्या पिरामिड स्तंभामध्ये अनेक भाकडकथा किंवा पुराणसमजुतींच्या मजकुरामध्ये सत्य इतिहासाचीही गुंफण आहे हे मान्य झाले आहे. तशीच मध्यआशियातील असीरिया बाबिलोनच्या मातीच्या ग्रांथिक विटासंग्रहामध्येही इतिहासाची गुंफण सापडते.

पण संस्कृतपुराणाच्याबद्दल ही स्थिती यायला फार प्रयास पडले; कारण. आमच्या राज्यकर्त्या साहेबानी त्यांना तसे सर्टिफिकेट दिले नव्हते.

पुराणातील अनाडी कल्पना बाजूला सारल्या तर त्यात इतिहास किती तरी सापडतो. आता अनाडी कल्पनांत किंवा भारुडात इतिहास कां दडविला असे कुणी विचारील तर त्याला उत्तर पूर्वकाळातील समजुतींच्या अरण्यात शिरावे लागेल. परमेश्वर हा मोठा गणिती व्यक्ति किंवा शक्ति आहे असे जर मोठमोठे इंग्रज शास्त्रज्ञ १९३० मध्ये जागतिक सायन्स काँग्रेसपुढे म्हणू शकतात तर पाच हजार वर्षांपूर्वीच्या अडाण्यानी वेद व पुराणग्रंथांतून समाजशास्त्र व इतिहास सांगताना अडाणी उपरणी किंवा पगड्या घातल्या तर बिचकून जाण्याचे कारण काय ? राजवाडे शास्त्रज्ञ या नात्याने उपरणे, पगडी वगैरे बाजूला सारून आमचा इतिहासजन्य अनुभव व विश्वास आहे. दुराग्रह नाही.

अशा परिस्थितीत "हिस्टोरियन्स हिस्टरी ऑफ दि वर्ल्ड" या ग्रंथातील राजवंशांच्या जनसमूहांच्या नामावळ्या घेऊन राजवाडे यांनी "आमची पुराणे व असीरियातील नवे शोध" या लेखाने युरोपियन इतिहासकारांचे अज्ञान खोडून काढले व हिंदुस्थानच्या अतिप्राचीन इतिहासाचा एक प्रचंड व नावीन्यपूर्ण खंड उघडून दाखविला. तरीपण विष्णुपुराण व इतर आधार दाखवूनही आमचे तज्ज्ञ शिक्षणखाते या इतिहासाला आमच्या शिक्षणक्रमात जागा देत नाही. याचे कारण ते स्वतः जरी अज्ञान नसले तरी शिक्षणाचे तंत्र ठरविणारी नोकरशाही अद्याप अंधारात व युरोपीय तज्ज्ञजन्य कुहरातच अडकलेली दिसते.

मनुष्यसमाज निर्माण झाला तेव्हा समाज या संस्थेची रचना करणे, तिचे नियमशास्त्र तयार करणे हे अपरिहार्यत्वाने येतेच व तिथूनच समाजरचनेचे, कुटुंबरचनेचे, परस्परसंबंधांचे व नंतर राज्यसंस्थेच्या स्वरूपाचे व घटनेचे तंत्र किंवा शास्त्र सुरू होते. मूर्धाभिषिक्त दंडधारी राजा ज्यात नाही अशी गणराज्ये, वैराज्ये, द्वैराज्ये इत्यादी अनेक घटनांचे प्रकार आपल्या देशात झाले. आजची आपली राज्यघटना ही जणू काय अत्यंत अननुभूत व अपूर्व संस्था आपण निर्माण केली आहे व त्यात अनेक दुरुस्त्या करून काय नवे ब्रह्मांड निर्माण केले आहे असे अनभिज्ञ तरुण व वृद्धांना सांगणा-या मंत्रिगणाला सुचना करावीशी वाटते की चालू वर्गकलहात, धर्म व जातिकलहात आपण जी कामगिरी केली ती स्वागतार्ह आहे हे खरे असले तरी हजारो वर्षांपूर्वी सुरू झालेल्या व अनेक शतके टिकलेल्या राजसंघटनांचा जो इतिहास राजवाडे, जायस्वाल यांनी मांडला आहे तो लक्षात घेऊनच चालू परिस्थितीच्या अभिमानाची व कामगिरीची चौकट त्यात बसवून मगच ऐतिहासिक दृष्टीने तसेच योग्य अभिमानदृष्टीने वागावे. आमच्या राज्यकर्त्यांना हे इतिहासवाचन सक्तीचे करावे व वर्गात बसवून ( अत्यंत गुप्त कॅबिनेट चेंबरमध्ये का होईना ) त्यांची परीक्षा घ्यावी असे राजवाडे यांनी नक्की सुचविले असते. घटनाशास्त्राला ऐतिहासिक, जानपदिक व वर्गीय दृष्टिकोण दिल्यावाचून जनतेची त्याबाबतची मान्यता अथवा अभिमान अथवा समज ही कृत्रिम व ढोलकबाजीला मान तुकविणा-यासारखी होण्याचा धोका असतो. म्हणूनच आम्ही म्हणतो की राजवाडे, कोसांबी, जायस्वाल यांचे ग्रंथ वाचणे हे सर्वमान्य करून घेतले पाहिजे. तसेच त्याला एंगल्सची अखेर जोड दिली पाहिजे. हे शेवटचे विधान सध्या मान्य नसले तर तात्पुरते बाजूला ठेवावे; पण प्रथम ऐतिहासिक दृष्टीचा विकास करून घ्यावा. मग एंगल्सवर पोचणे आपोआपच येईल असा शब्द किंवा वाक्यप्रक्रियेतून समाजाचा इतिहास दाखविण्याची राजवाड्यांची दृष्टि किती सखोल व विशाल आहे याचे आणखी उदाहरण म्हणजे अभिवादन व प्रत्यभिवादनाच्या प्रकारांचा जो विकास व -हास झाला त्याची राधामाधवमधील चर्चा पहावी ( पान १३६-३७). पाणिनीकालीन अभिवादनाचा प्रकार, त्याच्यानंतर पाच सहाशे वर्षांनी झालेल्या कात्यायनाच्या सूत्रांतील बदललेला प्रकार आणि कात्यायनानंतर दोनशे वर्षांनी झालेल्या पतंजलीच्या सूत्रातला प्रकार या तिहींची तुलना करून स्त्रियांचा दर्जा कसकसा उतरत गेला व तो आणि वैश्य व काही ब्राह्मण सुदा शुद्रत्वापर्यंत कसे पोचले याची फोड राजवाडे करतात. त्या व्याकरणशास्त्राची व इतिहासशास्त्राची जी फोड त्यांनी केली त्याची महती अद्याप आपल्या इतिहासकारांना, भाषाशास्त्रज्ञांना व समाजसुधारकांना अवगत झालेली दिसत नाही. व्याकरणातून समाजाचा विकास अथवा हास पहाणे हे मोठे अवघड काम आहे. त्यासाठी राजवाडे-दृष्टीच लागते आणि अशी त्यांची थोरवी पहाण्यात विद्वानाना मत्सर न वाटून त्यांनी त्या थोरवीचा उपयोग आपल्या देशाचा, समाजाचा व वर्गाचा इतिहास लिहिण्यास उद्युक्त व्हावे म्हणजे त्याचा लाभ प्रगत जगालाही मिळेल.

पाणिनीची अनैतिहासिक दृष्टी

"सर्वनामस्थान, म व पद यांच्या बाबीत मूळ प्रतिपादिका पासून अंगे तयार करण्याकरिता शेकडो ठिकाणी नवीन नवीन सूत्रे रचावी लागली आहेत. ह्या सूत्रांच्या जाळ्यातून वाट काढता काढता नवशिक्या व जूनशिक्या अशा दोन्ही विद्यार्थ्यांचे पंचप्राण कासावीस होतात; इतकेच नव्हे तर ठणठणीत कोरडे होतात. देव शब्दांची देव, देवा, देवे ही अंगे होतात किंवा तस्थिवसू शब्दांची तस्थिवत्, तस्थुष् व तस्थिवांसू ही अंगे होतात या सूत्रावरून विद्यार्थी जाणतो. परंतु आगम कां होतात, आदेश कां होतात, अंगे कां बदलतात हे पाणिनी सांगत नसल्यामुळे, शास्त्राध्ययनापासून मतीला जी प्रगतिशीलता व जो जागतेपणा यावा तो येत नाही, यांचे कारण इतिहासदृष्टीचा पूर्ण अभाव. वैदिक भाषा ही देवांची असून ती अर्थात् अनादि आहे अशी पाणिनीची विचित्र समजूत होती, यात मोठेसे नवल नाही. नवल दुसरेच आहे. वैदिक भाषेपासून संस्कृत भाषा निघाली या अर्थाचा एक शब्द किंवा एक ज्ञापक संबंध अष्टाध्यायीत एकही नाही. वैदिक भाषेचा संस्कृत भाषा हा अपभ्रंश किंवा विपरिणाम आहे ही सुद्धा कल्पना पाणिनीला शिवलेली नाही. शुद्ध प्रयोग विद्यार्थ्यांना कळावेत म्हणून पाणिनीने सूत्रे रचली. तत्रापि वेदात येणारे आर्ष प्रयोग व भाषेत येणारे लौकिक प्रयोग दोन्ही सारखेच शुद्ध आहेत असे तो मानी. छांदस प्रयोग विचित्र दिसला तर छंदसि बहुलं म्हणून वेदातील अशुद्ध नव्हता; पण हेंगाड्या रूपासंबंधाने पाणिनी तिरस्कार व उपहास न दाखविता उलटा आदर दाखवितो. या इतिहासांधतेमुळे वेदांच्या पाठीमागे जग नव्हते व काल नव्हता इत्यादी प्रगतिविरोधक कल्पना समाजात प्रचलित झाल्या आणि भावी कालासंबंधाने तुच्छता वाटू लागली. पूर्ववैदिक अनेक भाषा, वैदिक भाषा, पाणिनीय भाषा, प्राकृत भाषा व मराठी प्रभृती प्राकृतिक भाषा ही चढती वर्धमान श्रेढी आहे ही कल्पना यावयाची ती न येता, ही उतरती क्षीयमान श्रेढी आहे अशा विपरीत कल्पनेने समाजाचे मन भारून व उदासीन होऊन गेले. इतिहासदृष्टीच्या अभावापासून समाजाचे केवढे घोर नुकसान होते त्याचे पाणिनीय सूत्रे नामांकित उदा - हरण आहे.” (“ संस्कृत भाषेचा उलगडा " १९२० ची प्रत, पान ५३ ).

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास लिहू लागले तेव्हा पाराशराने सत्यवतीशी उघड संभोग केला हे विधान करण्याऐवजी जुन्या लेखकाला लाज वाटून त्याने धुके निर्माण करून त्या प्रकारावर काव्यमय पांघरूण घातले व ते बाजूला सारून खरा प्रकारे शास्त्र-शोधक राजवाड्यांनी सांगितला तर फार झाल्यास अडाण्यानी रागवावे; पण सर्व पंडितांनी, विद्वानांनी राजवाड्यांना आतापर्यंत मारण्याची किंवा अज्ञातात फेकण्याचा प्रयत्न केला त्याला काय म्हणायचे ?

ऐसि जरि देसिल भाख ।। तरि वारेन तुजसिं देख ॥
येरु तत्काळ देता झाला तये प्रत ।। बेत्याळिस सत्यवाचा ।। २६७ ॥
ऐसे जालें सत्यवचन ।। तंव सूर्योदय जाला जाण ।।
मग ते आणिलि नगरा लागुन ।। मनोहरा राक्षेसी ॥ २६८ ॥
असो ते मनोहरा ।। प्रशवलि अमित्य कुमारा ।।
शेषवंशि नृपवरा ॥ जे क्षेत्रि दारुण ।। २६९ ।।
ते मनोहरा सिंधाळदेशिची ।। तेथोनि नाम सिंधे शेषवंशी ॥
तें चालत आलें भुमंडळासी ।। सिंधे म्हणोनी ।। २७० ॥
या नंतरे अवधारा ॥ शकाधिकारि शालिवान जन्मला ॥
शेष ब्रह्मकुमरिसी रातला ।। भविष्य चरित्र ।। २७१ ।।
ते राहिला कुंभार शाळेसी ।। म्हणोन शाळिवान नाम तयासीं ।।
गोत्र वछ महाऋषी ।। कुळदेवता येकविरा ॥ २७२ ॥
पैठणी जाला उत्पन्न ॥ मृतिका अव्हानिली संपूर्ण ॥
दळ वारु हस्ति दारुण ॥ असंख्य केले ॥ २७३ ।।
तें कळलें विक्रमासीं ॥ तेणें वेताळ पाठविला हेरेसी ।।
तों फिरत आला पैठणासी ॥ तेथे तयासिं देखिलें ।। २७४ ।।
विचार पाहतां मानशी ।। शकाधिकारि जाला परियेसी ।।
चरित्र देखिलें नयनासी ॥ मग तेथोनि मुरडला ।। २७५ ॥
गेला उज्जनि-नगरी ॥ म्हणे विक्रमादित्यासि अवधारी ।।
कथा सांगितलि सविस्तरी ।। शाळिवानाची ॥ २७६ ॥
ऐकोन राजा सिद्ध जाला ॥ आपुले दळेसिं चालिला ॥
नदिपैलपारि राहिला । मग पाठविला शिष्ट ॥ २७७ ।।
येवोन शाळिवाना जाणविलें ।। युद्धासि चालावें वहिले ।।
ऐकोनि निरोप दिधले ॥ शाळिवाने ।। २७८ ।।
मग स्मरिला सहश्रफणी ॥ त्याणे नवनाग पाठविले तेथोनी ।।
अमृतकुपिका घेवोंनी ।। शाळिवाना जवळ आले ॥ २७९ ॥

इतिहासदृष्टीची गरुडझेप

राजवाड्यांच्या इतिहासदृष्टीची गरुडझेप इतकी मोठी होती की पाणिनीच्या व्याकरणाचीही फोड अथवा विवरण करताना त्यांना विकासक्षम समाज व विकासबद्धतेच्या पाय-या- पाय-याने परिवर्तित होणारा माणूस दिसत असे. त्यांच्या सगळ्या कार्याचे ध्येय व केंद्रबिंदू माणूस हा असे. त्यांचे यमन, संवर्धन, धनसंपादन, समाजविभाजन, व्यक्ती, कुटुंब व समूहसंबंधांचे शास्त्रशुद्ध वाचन करणे त्याचेच त्यांना वेड असे. पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये अस्मद्-युष्मद् ची रूपे करताना सात विभक्त्यांची एकवीस रूपे साधण्यासाठी त्याला तेवीस सूत्रे रचावी लागली (' संस्कृत भाषेचा उलगडा' पान ६२); कारण पाणिनीला पूर्वसमाजाच्या मिश्रणाचे व समन्वयाच्या घटनेचे ज्ञान पाहिजे तितके नव्हते असे राजवाड्यांनी म्हटल्यामुळे अनेक व्याकरणशास्त्री त्यांच्यावर उखडले. अनेकांनी राजवाडे-खंडनाचे लेख लिहिले आणि प्रश्न विचारला की व्याकरणाचा आणि समाजशास्राचा संबंध काय ? एका विद्वानाने तर राजवाड्यांना पाणिनी कळला नाही; कारण अमेरिकन व जर्मन भाषाशास्त्रज्ञांनी व वैय्याकरणानी तयार केलेल्या नव्या शास्त्राची त्यांना माहिती नव्हती असे म्हटले ! अशा विद्वानांची ज्ञानसंपादनाची पिल्ले "अन्यैद्विजैः परभृताः खलु पोषयन्ति " असे म्हटल्यास कोणी राग मानू नये. येथे हे लक्षात ठेवायला पाहिजे की राजवाड्यांना पाणिनीबद्दल अत्यंत आदर होता व त्याला व्याकरणाचा "भगवान सूर्य" ही त्यांनी म्हटलेले आहे. एका व्याकरणसूर्याने दुस-या व्याकरणसूर्याशी भांडणे शोभते तरी. परंतु परभृत विद्यासंपन्न खद्योतानी या दोन सूर्यांच्या भांडणात पडून स्वतःला भस्मसात् करून का घ्यावे ?

"संस्कृत भाषेचा उलगडा" या ग्रंथातील अस्मद्-युष्मद्चा ऊहापोह, नपुसकलिंगी शब्दातील म् व इ प्रत्यय कुठून आले याची उपपत्ती सांगताना राजवाडे म्हणतातः रानटी आर्यांपैकी एक समाज एक ही संख्या स्वतः जो हृम् म्हणजे आपण त्याने दाखवी व दोन ही संख्या निराळा जो त्वि त्याने दाखवी. म् व हे प्रत्ययांची वचने दाखविणारा समाज कोकण्यांच्याप्रमाणे किंवा फ्रेंचांच्याप्रमाणे किंवा डोंगरी भिल्लांच्याप्रमाणे आपली सर्व बोली नाकातून अनुनासिक बोले. या अनुनासिकप्रधान समाजाचा निरनुनासिक समाजाशी जेव्हा मिलाफ झाला तेव्हा नाकातून अनुनासिक उच्चार करणाच्या समाजाचे उच्चार पेद्रू ठरून त्यांच्या शब्दांची व प्रत्ययाची नेमणूक नपुंसक खात्यात झाली व केवळ पुल्लिंगी बोलणा-या समाजाच्या बोलण्यात पुं व नपुं अशी द्विलिंगी भाषा येऊ लागली. संस्कृत पाणिनीय व वैदिक भाषेत नपुंसकलिंगाच्या प्रवेशाची ही अशी हकीकत आहे.''

(“ संस्कृत भाषेचा उलगडा ' पान ६१ )

महाराष्ट्रात आता यो घडीला कोकणी-मराठीचा जो वाद चालविला जात आहे तसाच पूर्वी वैदिक व पाणिनीय अशा दोन समाजांत होऊन त्यातून ही तडजोड निघाली असे राजवाड्यांनी म्हटले तर जर्मन-अमेरिकन पदवीधारक विद्वानांना राग कां यावा हे समजत नाही.

खरे म्हणजे व्याकरण हें मनुष्यप्राण्याच्या भाषेचे शास्त्र आहे. मनुष्य हा एक प्राणी आहे पण त्याला भाषा आली म्हणून तो इतरांहून निराळा झाला असे महाभारतातला एक शृगाल एका ब्राह्मणाला सांगतो. म्हणून व्याकरणाची फोड करताना समाजशास्त्राचा वापर राजवाडे शास्त्रशुद्ध रीतीने करून जे पाणिनीला उकलले नाही त्याची उकल करतात. याबाबत एके ठिकाणी ते जे लिहितात ते लक्षात ठेवणे अत्यंत जरूर आहे म्हणून त्याचा उतारा इथे देणे आवश्यक वाटते.

हा नवा वर्गबद्ध किंवा नवशूद्र नववैश्य यावर आधारित वर्गीय समाज निर्माण झाला, व प्रथम त्रैवर्णिक होता तो चातुर्वर्णिक झाला. वर्ण व जाति यांचा पूर्वीचा सामाजिक सरमिसळ संबंध बदलुन संकराची प्रक्रिया निषिद्ध मानली जाऊ लागली. एवढेच नव्हे तर पूर्वीचे जे समसमा शूद्र त्यामध्ये दोन भेद पडले. एकाचे नाव पडले अवसित शूद्र व  दुस-याचे नाव पडले निरवसित शूद्र. अवसित तर अद्याप आर्यांच्या वर्णजातींच्या सत्तेमध्येच बसायला तयार नव्हता. तो समाजबाह्य ग्रामसंस्थाबाहय, होता; कारण त्याचा स्वतंत्र समाजच इतका शक्तिमान होता की तो आर्यांच्या चातुर्वर्ण्याच्या श्रमविभागणीत बसायला तयारच नव्हता.
त्याचबरोबर निरवसित शूद्र ही आपापल्या कर्मकौशल्याच्या बळावर ब्राह्मणाशी, क्षत्रियांशी लग्न लावून त्यांच्याच घरात मळ्यावर अथवा खळ्यावर काम करून ब्राह्मण-क्षत्रियांच्या संसारात व गोतवळ्यात राहून वरच्या वर्गामध्ये किंवा तत्समान स्थितीमधे उभा राहू लागला होता. एवढेच नव्हे तर संपत्तीच्या वाटणीमधे त्याचा हिस्साही ठेवला जात होता. ही हिस्सेवाटणी मनूला सुद्धा मानावी लागली हे त्याच्या स्मृतीमध्ये नमूद आहे.

पण हे थांबणार कुठे ? ही श्रमाची समाजविभागणी निरवसितांच्या आगमनाने व साहचर्याने बिघडू लागली. त्यात आणखी खाजगी मालमत्तेच्या वाढीने समाजामध्ये वर्णजाती व वर्गविग्रहाचे काहूर उत्पन्न झाले. ब्राह्मण-क्षत्रियांमध्ये कळपावरून, संपत्तीच्या वाटणीवरून युद्धे होऊ लागली. तेव्हा हे परस्थ “ अवसित ”, ज्यात नुसते शूद्रच नव्हते, त्यांची आर्य समाजात नव्या शास्त्रबंधनावर आधारलेली रचना करणे आवश्यक झाले. त्या प्रक्रियेमधूनच व संघर्षातून राज्यसंस्था निर्माण झाली व दंडधारी राज्ययंत्र अस्तित्वात आले. महाभारतातील उल्लेखिलेली " रक्तानुबंधी ” समाजरचना जाऊन राजदंडनियमनबद्ध प्रदेशानुबंधी समाज अथवा राज्य निर्माण झाले. या राज्यसंस्थेचे अनेक प्रकार होते; पण त्यामुळे संपत्तिसाधन, श्रमविभाजन व परस्पर-उत्पादन-संबंधांचे नियमन हे सोपे झाले. त्यामुळे प्रथम आर्य समाजाचा झपाट्याने विकास झाला. समाजविघातक संघर्षाला आळा बसला. ही प्रक्रिया ग्रीक समाजात कशी झाली व तिचे मूलभूत तत्त्व काय हे एंगल्सच्याच पुस्तकाने समजू लागते.

राजवाड्यांनी पुरुषसूक्ताची व निरनिराळ्या राज्यघटनांची जी फोड केली आहे तिला आपल्या देशातील इतिहासलेखनात जोड नाही. जायस्वाल यांनी आपल्या ग्रंथात हा विषय गणसंघरचना या सदरात घेतला आहे. पाणिनीकालींन राज्य-संस्थांच्या प्रकाराची वर्णनेही दिली आहेत. वार्तोपजीवीसंघ, आयुधोपजीवी संघ इत्यादी राज्यघटना यामध्ये प्राचीन हिंदुस्थानातील किंवा आर्यसमाजातील राज्यरचनेचा मोठा गंभीर व अर्थपूर्ण इतिहास आहे; परंतु आमच्या शिक्षणक्रमात किंवा ज्ञानार्जनात इंग्रज, फ्रेंच अमेरिकन व आता भारतीय घटनांची त्यांच्या उपसूचनांची चर्चाच काय ती केली जाते. एवढेच नव्हे तर खाजगी मालमत्तेची मालकी व वर्ण व जातिसंस्था प्राथमिक अवस्थांत असताना जेथे दमनधर्मी अथवा दंडधारी राज्ययंत्र नव्हते अशा समाजाची कल्पनाही आमच्या इतिहासाच्या शिकवणुकीत येत नाही. अर्थातच अशा शिक्षणावर राजवाडे किंवा कोसांबी किंवा जायस्वाल यांच्या व यांच्यावर शास्त्रशुद्ध कळस चढविणाच्या मार्क्स-एंगल्स यांच्या सिद्धान्ताचा काय प्रकाश पडणार ?

पण हा कायदा एकतर्फी नव्हता याचीही मांडणी राजवाड्यांनी केली आहे. "शूद्रानी सर्व दासकर्म आटोपल्यामुळे स्वास्थ्य व फुरसत मुबलक मिळून वैश्यांना व्यापारधंद्याकडे, क्षत्रियांना देशसंरक्षणाकडे व ब्राह्मणांना विद्यावृद्धीकडे लक्ष देण्यास सापडून राष्ट्रांची चोहोकडून भरभराट झाली. आफ्रिकन गुलाम मिळाल्यामुळे युरोपियन व अमेरिकन राष्ट्रांची गेल्या चारशे वर्षांत जशी अभूतपूर्व भरभराट व प्रगती झाली तशीच प्रगती उत्तर कुरूंतील आर्यांची शूद्रप्राप्तीने झाली. पुरुषसूक्तकार मोठ्या दिमाखाने व फुशारकीने सांगतो की विराटसंस्था स्थापन होऊन, चातुवर्ण्याची समाजपद्धत सुरू झाल्यापासून घोडे, गाई, शेळ्यामेंढ्या इत्यादि संपत्ती वाढून ऋक, यजुः, साम व अथर्व अशा चार वेदांचे उपबृंहण झाले आणि वैराज्य भोवतालील सर्व भूमी आक्रमून बसले.” ( राधामाधव. पान १४४-१४५ )

त्याच्या पुढचे विवेचन पुढे पाहू. प्रथमतः निसर्ग, उत्पादनाचे हत्यार व मनुष्य आणि यातून उत्पादन झालेली वस्तू ही केवळ त्या मनुष्यसमूहापुरतीच वापरली जाई. हत्यार व कौशल्य यांची वाढ होऊन गरजेपेक्षा उत्पादन करण्याची क्षमता येताच दुस-याकडून श्रम करून घेऊन, त्याच्या पोटापाण्यासाठी लागणारा हिस्सा ठेवून त्याच्यावरचा अतिरिक्त हिस्सा स्वतःचीच मालमत्ता करण्याची पद्धती निर्माण झाली. संभोगार्थ सामायिक उत्पादन अशी स्थिती होती तोपर्यंत वैश्य-शूद्र कर्म व त्यांच्याशी शरीरसंबंध व त्यांची प्रजा ही धर्मबाह्य नव्हती. तसेच त्यामध्ये बाह्य समाज येण्याची किंवा गुलामीसमान शूद्र जाती निर्माण होण्याची शक्यता नव्हती.

पण साधनांची व मनुष्यबलाची उत्पादक शक्ती वाढली तसे त्यामध्ये लढाईत किंवा इतर मार्गांनी सापडलेल्या टोळ्यांना आपल्या तंत्रांत किंवा वर्ण-जातिरचनेत आणून त्यांच्या वर "राज्ययंत्र-शक्ति" स्थापण्याची आवश्यकता उत्पन्न झाली. समाजाच्या रचनेमध्ये जातिभेदांना केवळ कर्मभेदाचे जे स्वरूप होते व शूदीपासून ब्राह्मणाला झालेली मुले ही ब्राह्मणच समजली जात व शूद्रा-भार्यः असे ब्राह्मण कुटुंब असे ती पद्धत बंद पडली. नवी वर्ण व जातिसंस्था निर्माण झाली. जिच्यामध्ये पूर्वीचे नैसर्गिक व उपभोगहेतु-पूर्तीचे उत्पादनकार्यामधले वर्ण-जातिसंबंध शास्त्रशुद्ध समजले जात त्यात फरक घडला. त्याची सुरुवात शूद्रामध्ये दोन भाग करून झाली.

राधामाधवचे हे विवरण इतके इतिहासदृष्टया अमोल आहे की त्याचे मूल्यमापन व संपूर्ण फोड इथे करणे कठीण आहे.

येथून मात्र राजवाडे यांच्या आणि मार्क्सप्रणीत सिद्धान्तांची फोड निरनिराळ्या रीतीने करणे भाग पडते.

उतर वयांत [उत्तरे वयसि = उतर वयांत, उत्तरति वयसि = उतार वयांत, उत्तरे वयसि=उत्तर विशींत] (भा. इ. १८३४)

उतराणी [उत्तमारणिका = उत्तराणी] (भा. इ. १८३४)

उताणसा ( सा-सी-सें ) [ उत्तानशयः = उताणसा ] तो उताणसा निजतो = स उत्तानशयः शेते. (भा. इ. १८३४)

उतावळ (ळा-ळी-ळें) [उत्तापकः=उत्तावल: (मृच्छकटिक) = उतावळ (ळा-ळी-ळें ) ]

उतावळा [तप् १ संतापे. उपतापिलः = उताविळा = उतावळा] उपताप म्ह० घाई.

उत्छाद [ उत्सेध (voilence ) = उत्छाद ] पोरांनीं काय उत्छाद मांडला आहे ! उत्सेधजीविनः ५-३-१३३ पाणिनि.

उत्छाद, उच्छाद [ उत्सादः = उच्छाद ]

उत्फुल्ल [ फुल् संचलने ] (फुलें पहा)

उथळ [उत्स्थल = उथ्थल = उथळ ] (ग्रंथमाला)

उदंड [उद्दंड ( formidable, great ) = उदंड ]

उदवाउडव [ उद्+ वप्]

उंदीरकानी [ (आखुकर्णिका) उंदूरकर्णिक = उंदीरकानी (वनस्पति ) ] (भा. इ. १८३७)

उदेल [उपदेह + तैल = उदेल. उपदेह (उटणें) ]

उदेल ( ला-ली-लें ) [ (वद्) उदित + ल उदिअल = उदेल (ला-ली-लें ) ] अशी वाचा उदेली = ईदृशा वाक् उदिता (उदेली म्ह० बोलिली गेली) (वद्) वद् + ल = वदल (ला-ली-लें).

उदो [ हु ३ दानादानयोः, उद्धव = उधो = उदो ] खेडोबाचा उदो म्ह० सण. (धा. सा. श.)

उदो उदो [उद्धव sacrificial fire, festival = उधो = उदो ] खंडोबाचा उदो म्ह० खंडोबाचा festival.

उद्या, उद्यां [ उदये ] ( आज पहा)

उद्वस [उद्वसं (ओसाड) = उद्वस] उध्वस्त शब्द निराळा.

उधई [ उपदेहिका (मुंगी ) = उधई; उद्देहिका (ant) = उधई ]

उधान [ उद्धान उत् + हा = उधान ]

उधार [ - स्यादृणं पर्युदंचनं ॥ २ ॥ उद्धारः - ॥ ३ ॥
(द्वितीयकांड - अमर - वैश्यवर्ग ) ] ऋण, पर्युदंचन व उद्धार हे तीन शब्द ऋणाला आहेत. उद्धार = उधार. उधार म्ह० ऋण. ऋणानें आणिलेली म्ह० रोख पैसे न देतां आणिलेली जी वस्तु ती उधार आणिलेली वस्तु. ( भा. इ. १८३३)

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries