Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

स्थलनामव्युत्पत्तिकोश

४ खानदेशांत वसाहत करतांना १४२८ गांवांना ३३५ वनस्पतीं वरून वसाहतवाल्यांनीं नांवें दिलीं. ती ती वनस्पति त्या त्या स्थलीं पहिल्या वसाहतवाल्यांना ज्या उत्कटत्वानें भासमान झाली तें च उत्कटत्व सध्यां त्या त्या गांवीं भासमान होतें कीं कसें, हें त्या त्या गांवच्या शोधक लोकांनीं पाहिलें पाहिजे.

५ वड, पिंपळ, उंबर, निंब, पळस, वगैरे मोठमोठ्या व तुळस, सांवा, मेथी, वगैरे प्रसिद्ध वनस्पती ह्यांचीं जीं संस्कृत नांवें तीं आज दोन अडीच हजार वर्षे त्या च कमजास्त अपभ्रष्ट रूपांनीं आपणां पर्यंत येऊन ठेपलीं आहेत, या बाबींत ह्मणण्या सारखा विशेष नाहीं. विशेष जे आहे तो इतर वनस्पतिनामां संबंधानें आहे. कर्क, कच, कवर वगैरे शेंकडों वनस्पतिनामें वैद्यशास्राच्या ग्रंथांतून आढळतात. एकेका वनस्पतीचीं अनेक नांवें ह्या ग्रंथांतून दिलेलीं असतात. हीं एका च वनस्पतीचीं अनेक नांवें लोकांत कधीं सररहा प्रचलित असतील कीं नाही,या बाबीची शंका येण्यास बहुत कारणें आहेत. गुणां वरून व रूपां वरून, अनेक नामां मधील कांहीं नांवें वैद्यशास्त्र्यांनी पाडिलीं असतील, हें उघड आहे. परंतु त्या अनेक नामांतून निदान एकेक नांव तरी सर्वजन प्रसिद्ध होतें, हें वरील यादीतील ३३५ वनस्पतिनामां वरून स्पष्ट होतें. वाळ्याला कच व तिळवणीला कवर हें नांव वसाहतकालीन जनसमूहांत प्रचलित होतें, एवढी बाब या ग्रामनामां वरून निःसंशय सिद्ध आहे. वसाहतकालीं जिला कवर ह्मणत तिला च सध्यां आपण तिळवण ऊर्फ तिलपर्णिका ह्मणतों. म्हणजे कवर व तिलपर्णिका हीं दोन नांवें एका च वनस्पतीचीं जनसमूहांत कालभदानें प्रसिद्ध होतीं असें झालें. प्रान्तभेदानें आणीक हि नांवें त्या च एका वनस्पतीचीं प्रचलित असण्याचा संभव आहे. तात्पर्य, एका च वनस्पतीचीं अनेक नांवें वैद्यशास्त्रग्रंथांत जीं येतात त्यां पैकीं कांहीं नांवें जनप्रचारांतील आहेत, इतकें स्पष्ट ह्मणण्यास वरील ग्रामनामावलीचा उपयोग होतो.

६ ऋग्वेदा पासून व अथर्ववेदा पासून तो तहत अगदी अलीकडील संस्कृत ग्रंथांची ऐतिहासिक परंपरा लावून जर वैद्यकशास्त्रांतर्गत वानस्पत्याचा पुढेंमागें एखाद्या दीर्घोद्योगी शंकरदीक्षितानें इतिहास लिहिला, तर प्रकृत ३३५ वनस्पतींचीं नांवें ज्या संस्कृत ग्रंथांत प्रथन येतील त्या ग्रथाचा काल त्या वनस्पांतिजन्य ग्रामनामाचा काल म्हणतां येईल. खानदेशांतील ही १४२८ ग्रामें एकदम दहा पांच वर्षात बसलीं असें नाहीं. वसाहत करण्याचा क्रम सुमार ५०० वर्षे चाललेला असावा. पाणिनीचा काल जर १००० शकपूर्व धरला, तर वसाहतकाल शकपूर्व ५०० च्या सुमारास ऐन भरांत येतो. म्हणजे बुद्धकालीं वसाहतकर्म बरेंच संपून गेलेलें होतें. जुनाट बौद्धग्रंथांत दक्षिणेंत बरीच वसती झाली असल्याचे उल्लेख आहेत, व त्या उल्‍लेखां बरोबर महाकान्ताराच्या अस्तित्वाचा हि उल्लेख आहे. म्हणजे इतरत्र बरी च दाट वसती होऊन सातपुडा व विंध्याद्रि यांच्या आसपास महाकान्तार अवशिष्ट राहिलेलें होतें. वसाहतकर्माच्या पहिल्या भरांत ग्रामसीमा सध्यां प्रचलित आहेत त्या ग्रामसीमां हून दुप्पटतिप्पटं विस्तीर्ण होत्या. पुढें एका गांवाचीं दोन, तीन किंवा चार गांवें होऊन ह्या सीमा निमपट, तृतीयांश किंवा चतुर्थांश झाल्या. खुर्द, बुजुर्ग, सीम, चहारम्, म्हणजे मोठें, लहान, तिसरें व चवथें किंवा पंजम म्हणजे पांचवें अशीं विशेषकें फुटून बनलेल्या पोटगांवांना मिळाली. हीं विशेषकें मुसुलमानकाळांत मिळाली, असें नव्हे. तीं तत्पूर्वीच मिळालेलीं होती. इतकें च कीं मुसुलमानकाळांत फारसी विशेषकें प्रचारांत आली. खानदेशांत हिंदुकालांत वसलेलीं एकोनएक सर्व गांवें मोठ्या नद्या, मध्यम नद्या व क्षुद्र नद्या किंवा ओढे ह्यांच्या पाण्याच्या आश्रयानें मैल पाऊण मैलाच्या अंतरानें वसलेलीं होती. बिनपाण्याच्या वैराण खडकां वर जी गांवें क्वचित आढळतात तीं पाण्याची मातब्बरी न ओळखणा-या मुसुलमानांनीं वसविलेलीं अलीकडील पांचशे वंर्षातील आहेत.